श्रावण आला, घेऊन आला,

श्रावण आला, घेऊन आला,इंद्रधनुष्यी आठवणीला,

पोरवयातील, नवथर हुरहूर,ऊनपाऊस खेळ रंगला ।

ते शिवमंदीर, नदीकिनारी,दूर कुठे ती घुमे बासरी,

अवखळ वारा येता जाता,घंटानादे मस्ती अन करी ।

श्रावणसरीची ओढ अनावर,नकळत गेले किती दूरवर,

कानी घुमती सूर जादुमय,हाक अनोखी रोखू कुठवर ।

झाडाखाली डोळे मिटूनी, वाजवी पावा, युवक तो कुणी,

तिथेच बसले भान हरपूनी,सूरवेडी जणू राधा बनुनी ।

काळ थबकला, मंतरले क्षण,मोहित सारे, वृक्षवेली पण,

सूर थांबले, भान जागले,सलज्ज तनुवर काटे फुलले ।

मुखकमल मग झाकून घेऊन,त्वरीत पळाले मी अन लाजून,

कोण कुठला, कुण्या गावचा, कसा भासला तो मज मोहन ।

किती श्रावण ते आले गेले,किती सावळे मेघ बरसले,

अजून शोधते कृष्णसख्याला,श्रावणसरींनी डोळे भरले ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?